Sunday, July 11, 2010

केईएम ला केईएम सारखंच ठेवायंच आहे...!!!

पुर्वप्रसिध्द्दी- महानगर # संपादक - वृंदा शरद बाळ # जुलै-२०१०

केईएम म्हणजे आरोग्य क्षेत्रातली दंतकथा. जन्म मृत्युसोबत इथं जगण्यातल्या तमाम दुखांचीही नोद होत असते. माणसा-माणसातले संबंध, नात्या-नात्यातली वीण, कुटुंब, आप्तेष्ट, मित्रपरिवार, सगे-सोयरे यांच्यातल्या भावभावनांचा खेळ इथंच बघायला मिळतो. आपल्या-परक्याची सिमारेषा सुस्पष्ट दिसायला लागते ती इथंच. आपल्या माणसासाठी रात्र रात्र जागणारी आणि केवळ उपचार म्हणून मारी बिस्कीटाचा पुडा आणि नारळातलं पाणी पुढे करुन तोंडदेखली चुकचुकणारी कित्तेक माणसं याच केईएमनं पाहिली आहेत. वेदना, यातना, पिडा या शब्दांचा कचरा इथं जागोजाग साचलेला दिसतो. आक्रोश आणि आसवांची तर गिनतीच नाही. 'मी'च का? माझ्याच वाटयाला हे सर्व का? असं म्हणून परमेश्वरालाही थेट जाब विचारावा, धारेवर धारावं अशी ही जागा. पाप-पुण्याचा हिशोब मांडायला फुरसत मिळते ती ही इथंच. इथून निघतांना माणूस दोनच गोष्टी बाहेर घेऊन जातो, ते म्हणजे आनंद किंवा दु:ख. कुणाचा वाटा कोणता आहे, कुणाच्या नशीबी कोणते भोग यावेत याची कुंडली काळ मांडत असतो आणि या भोगाची तिव्रता कमी करण्यासाठी अहोरात्र कष्टत असतात डॉ. संजय ओक आणि त्यांचा परिवार.
डॉ. संजय ओक केईएमचे आजचे डीन. पाउणशे वर्षांच्या इतिहासाचे आत्ताचे साक्षिदार. नुकतीच आरोग्य सेवेतली त्यांनी एकवीस वर्षे पुर्ण केली. त्या निमित्तानं त्यांच्याशी बातचीत. गरीब कुटुंबातून वर आलेल्या डॉक्टरचा प्रवास आणि त्यांच्या भविष्यातील स्वप्नांचा लेखाजोखा.

डॉक्टर व्हावसं का वाटलं?

एकतर आपल्या हुशार मुलांनी डॉक्टर व्हावं असं स्वप्न आपल्या आईवडीलांनी पहाण्याचा तो काळ. माझ्या वडिलांची मी डॉक्टर तेही सर्जन व्हावं अशी इच्छा होती. त्यासाठी त्यांनी मेहनत घेतली. घरातलं वातावरण मी डॉक्टर होण्यास अनुकुल ठेवलं. त्यामुळंच मी शिवाजी विद्यापीठातून एम.बी.बी.एस आणि एम.एस पुर्ण केलं.

मुंबईत कसे, कधी आलात? केईएम चे डीन होऊ असं वाटलं होतं?

१९८६ साली. माझं अकॅडेमीक करिअर चांगलं होतं. ते बघून डॉ. स्नेहलता देशमुख यांनी मला एक पत्र पाठवलं आणि मुंबईत बोलावून घेतलं. आणि मग सुरुवातच झाली. गेल्या १ जुलैला या गोष्टीला एकवीस वर्षे पूर्ण झाली. आजही मला ते दिवस लख्ख आठवतात. मुंबईतलं असं कोणतही मोठं हॉस्पिटल नसेल जिथे मी नोकरी केली नाही. केईएम चा डीन होईन असं स्वप्नातही नव्हतं. मी माझं काम करीत गेलो. डीन होणं ही चांगल्या कामाची पावती आहे असं मी समजतो.

रॅगींग या विषयाकडे तुम्ही आज कसे बघता? मुन्नाभाई एमबीबीएस मुळे तो विषय जरा जास्त अधोरेखीत झाला होता. अधुनमधुन वर्तमानपत्रात वाचायलाही मिळतं..

मी ही विद्यार्थीदशेत असतांना सुरुवातीला रॅगींगचा बळी होतो. पण त्याचं प्रमाण अगदीच मामुली होतं. व्हर्बल कमेंटस किंवा गाणी म्हणून दाखव या टाईपमधलं. पण पुढे पुढे धीर चेपला. नंतर याच कॉलेजात मी विद्यार्थी नेता होतो. खाजगीकरणाविरोधी आम्ही आंदोलनंही केली होती.
आज रॅगींग प्रतिबंधक कायदा अस्तीत्वात आहे. त्याला कठोर शिक्षाही आहेत. त्यामुळे काही प्रमाणात त्याला आळा बसला आहे. पण बळी तो कान पिळी या न्यायाप्रमाणं काही गोष्टी छुप्या पध्दतीनं चालू असतात. आज त्याचं प्रमाण निश्चितच कमी झालं आहे.

डॉक्टर झाल्यावर स्वतंत्र खाजगी प्रॅक्टीस करावी असं वाटलं नाही? काय कारणं होती पैसा, आत्मविश्वास की मराठी माणूस...?

त्याही काळी सरकारी नोकरीपेक्षा खाजगी क्षेत्र चढणीलाच होतं. पण नोकरीच करायची असं पहिल्यापासूनच ठरवलं होतं. आणि या माझ्या ठरवण्याला पुर्ण आकार दिला तो देशमुख बाईनी. ज्या मला माझ्या आई समानही आहेत. आजही त्यांच्याशी माझे स्नेहाचे संबध आहेत. त्यांनी माझ्यातला शिक्षक जागा केला. माझ्या भविष्याची दिशा ठरवून दिली. त्याचबरोबर डॉ. प्रकाश जहागीरदार. असे शिक्षक मार्गदर्शक मिळायला भाग्य लागतं. ते मला मिळालं. त्यामुळं इतक्या वर्षातल्या सरकारी सेवेचा मला पश्चाताप नाही. आज सहावा वेतन आयोग आहे. तेव्हा तो ही नव्हता. महिन्या अखेरीचा पगार मध्यमवर्गासारखा मलाही जेरीला आणायचा. पण कामाचं समाधान त्याच्याही पेक्षा शतपटीनं असायचं. जे सुख शांती, समाधान आणि सौभाग्य मला सरकारी नोकरीनं दिलं ते खाजगी प्रॅक्टीसनं कधीही दिलं नसतं. मला आजही माहीत आहे आणि तेव्हाही माहीती होतं की मी जे महिन्याला कमावतो आहे ते मला रोज छापता आलं असतं. पण पैशापेक्षाही वेगळी दुनीया असते ती मला या नोकरीनं दाखवली. खाजगी प्रॅक्टीस करुन मिळवलेला निव्वळ पैसा ते करु शकला नसता.... आणि मराठी म्हणशील तर तो मी आहेच.

या व्यवसायात कट प्रॅक्टीस, रिपोर्ट्सचं रॅकेट जोरदार आहे...

हे अगदी सुश्रुताच्या काळापासनंच चालत आलं आहे. डॉक्टर म्हणजे देव तरी असतो किंवा यम तरी, अश्या स्वरुपाचे श्लोक तेव्हाही पहायला मिळायचे. सरकारनं काही थेट ह्स्तक्षेप केला नाही तर हे टाळता येणं अश्यक्य आहे. आणि आपला वेळ प्रसंगी खिश्याला चाट देऊन रुग्णांना मदत करणारेही अनेक डॉक्टर आहेत. जिथं वाईट आहे तिथं चांगलंही आहे. आज केईइएम मध्ये कधी कधी अडीच अडीच लाखाच्या सर्जरी विनामुल्य होतात. तपासण्या, औषधांचा खर्चही नगण्य असतो. हे ही आहेच की...

बोगस किंवा अनधिकॄत डॉक्टर झोपडपट्ट्यातून दिसतात. त्यांच काय?

त्यांना आळा घालणं हे राज्य सरकारचं काम आहे. महाराष्ट्र मेडीकल कौन्सील सारख्या संस्था आहेत. जे याला आळा घालू शकतात. आम्ही म्हणजे महानगरपालिकेच्या असे डॉक्टर निदर्शनास आले तर आम्ही त्याची यादी सरकारकडे सोपवतो. त्यांचं पुढ काय करायचं हा निर्णय सरकारचाच असतो.

सरकारी नोकरीच्या काही मर्यादा असतात का? तुमचा काय अनुभव...

सरकार ही एक चौकट असते. पण त्या चौकटीतही स्वातंत्र्य असतं. ते आपलं आपल्याला कळलं पाहिजे. या चौकटीत काहीही न करताही रिटायर्ड होता येतं. पण चॉईस आपला असतो. काही निर्णयांना उशीर होतो. मंजूरी लागते. पण ही त्या कामाची, यंत्रणेची गरज असते. ती गरज आपल्याला कळली की काम सोपं होतं. नुसतंच सरकार वाईट असं म्हणून चालत नाही. त्याच्या चांगल्या बाजू लक्षात ठेऊन आपल्याला नांदावं लागतं. कारण आपला संबध काम होण्याशी असतो. ते करवून घेण्याचं कौशल्य कलेकलेनं आपल्यात डेव्हलप होत जातं. जर ही यंत्रणा नाकाम असती तर ती इतके दिवस टिकून राहिली नसती. तीची म्हणून तिला एक स्ट्रेन्थ आहे. ती आपल्याला ओळखता आली पाहिजे. आज मी इथपर्यंत पोहोचलो म्हणजे हे मला कळलं आहे, नाही का?

डॉक्टरांचे संप त्यामुळे रुग्णांचे हाल होतात. या व्यवसायाला काही पथ्य असावीत की इतर व्यवसायासारखाच हा ही व्यवसाय मोजला जावा? आपल्याला काय वाटते?

दुर्दैवानं आता डॉक्टरी पेशालाही व्यवसायाचं स्वरुप आलंय. ते टाळता येण्यासारखं नाहीये. पण व्यवसायाच्या पलिकडेही जाउन जेव्हा रुग्णांच्या जीवाशी खेळ चालतो तेव्हा ते फारच भयावह वाटतं. आणि संपाचं म्हणशील तर आता सगळ्याच क्षेत्रात एक प्रकारची जागरुकता आलेली आहे. प्रत्येकाला आपल्याला मिळणार्‍या सुखसोई कायम कमीच वाटतात. ज्यानी त्यानी आपल्या मागण्यांसाठी आग्रह धरणं चुकीचा नाही म्हणता येणार. पण त्यासाठी दुसर्‍याला वेठीस धरणं चुकीचंच आहे. डॉक्टरांच्या संपाच्या वेळी रुग्णांचे हाल होतात. हे खरं आहे.

प्रत्येक डॉक्टरने खेडयामध्ये जाऊन काही काळ प्रॅक्टीस करावी असा कायदा आहे. पण तो मात्र मानला जात नाही...

याला कारण विद्यार्थ्यानी डॉक्टर होण्यासाठी घातलेला पैसा. डॉक्टर म्हणजे पैसे छापण्याचं मशीनच बनला आहे. आणि कायद्याच म्हणशील, तर कायदा म्हणतो खेडयात जा नाहीतर एक लाख भरा. आज लाख रुपये सरकारच्या तोंडावर फेकून आपली सुटका करुन घेणारे कित्तेक आहेत. खरंतर खेडयात आज डॉक्टरांची सगळ्यात जास्त गरज आहे. अगदी ठाण्यापलिकडे चार्-पाच किलोमिटर गेलात तरी तिथं कुठल्याही प्रकारच्या आरोग्याच्या सोई नाहीत. मला वाटतं हे जर खरोखरच असं व्हावं असं सरकारला वाटत असेल. तर तो अभ्यासक्रमाचाच भाग बनला पाहिजे. प्रत्येक डॉक्टरला खेड्यात जाणं कम्पलसरी करायला हवं यातूनच ते हाऊ शकतं. जसं परदेशात मिलिटरीची नोकरी करणं प्रत्येक डॉक्टरला सक्त्तीचं असतं, तसं इथंही व्हायला पाहिजे.

सरकारी खात्यात नवीन दाखल झालेल्या मशीन्स/उपकरणे बिघडली तर ती दुरुस्त करण्याची तजवीज नसते. आपल्या हॉस्पीटलमध्ये असे बंद पडलेले विभाग किती आहेत?

सुदैवानं केईएम मध्ये असं नाही. आज प्रत्येक विभागात बसवलेली अद्ययावत यंत्रणा चालू स्थीतीत आहे. याला कारण म्हणजे आम्ही तशी सोयच करुन ठवलेली आहे. कोणतही नवीन मशीन घेण्याबरोबरच आम्ही कमीतकमी पाच वर्षाचं अन्युअल मेंटेनन्सचं कॉन्ट्रॅक्टच करतो. प्रत्येक मशीन बरोबर मुळ कंपनी तीन वर्षांची वॉरंटी देते. त्यानंतरची पाच वर्षे. कदाचीत यात अधीक पैसे जातात. पण हेतू साध्य होतो. आणि केइएम सारख्या रुग्णालयात कुठलंही मशीन आठ वर्ष राहिलं तरी खुपच झालं

रात्री अपरात्री कधीही केईएममध्ये कुणालाही मुक्त प्रवेश घेता येतो? केइएम हॉस्पिटलच्या सुरक्षे विषयी कोणत्या सोयी आहेत? त्या पुरेशा आहेत का?

सुरक्षेच्या बाबतीत मी समाधानी नाही. कारण सुरक्षा रक्षकांची संख्या फारच कमी आहे. इथं महिला सुरक्षारक्षकांचीही गरज आहे. कारण काही महिला मार्‍यामार्‍याही करतात. त्यावेळी पुरुष सुरक्षारक्षकाला नुसतं बघत राहण्यापलिकडे काहिच करता येत नाही. अठराशे बेडचं हॉस्पिटल. तेवढेच किंबहुना याहुन जास्त रुग्ण. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक. त्याना बघायला येणारे असा पाच-सात हजार माणसांचा जथा रोज केईएमच्या आवारात असतो. त्याला आवर घालणं निश्चीतच सोपं नाही.

आणि केईएम्च्या सुरक्षा यंत्रणेचा कार्यभार डीन च्या अखत्यारीत येत नाही. त्याला स्वतंत्र खातं आणि त्याचा कमिशनर वेगळा असतो.

स्वच्छतेच्या बाबतीतही इथं अशीच अवस्था आहे...

आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत असतो. पण येणारी माणसं आपल्या सवयीनाही बरोबर घेऊन येतात. थूंकणे हा आपला जन्मसिध्द अधिकार असल्यासारखी माणसं वागतात. जिथे थुंकु नका असं लिहिलेलं असतं त्यावरही माणसं थुंकतात. आम्ही एक रंगरंगोटीचा अभिनव उपक्रम केला होता. प्रवेशद्वाराजवळचे खांब आम्ही रोज सकाळी रंगवून घ्यायचो. पुन्हा रात्रीपर्यंत तो पिचकार्‍यानी रंगलेला असायचा. स्वच्छतेच्या बाबतीत आमच्या कर्मचार्‍यांनी कितीही खबरदारी घेतली तरी ती कमीच वाटते. लोकांनीही आम्हाला मदत,सहकार्य करायला हवे.

खाजगी मदत किंवा कॉर्पोरेट पार्टनरशीपचा काही विचार करता...

असे अनेक प्रस्ताव आहेत. पण हे मानायला युनीयन्स तयार होत नाहीत. त्याना खाजकीकरण होईल की काय याची भीती वाटते.

युनीयनचा आणि व्यवस्थापनेचे संबंध कसे आहेत?

जसे इतर ठिकाणी असतात तसेच. प्रत्येकानी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवली की आम्ही व्यवस्थापन म्हणूनही आमची जबाबदारी टाळत नाही. माझे सगळ्याच म्हणजे जवळजवळ सहा युनीयन्सची संबध चांगले आहेत.

तुमच्या कारकिर्दीत सुरु झालेला एखादा उपक्रम...

इथे जवळजवळ साडेतीन हजाराहुन जास्त स्टाफ आहे. ज्यांचा रुग्णांशी त्यांच्या नातेवाईकांशी रोजचा संबध येतो. कर्मचारी आणि इथं येणार्‍या माणसांचं प्रमाण कायम व्यस्त असतं. डॉक्टरांनी, नर्सेसनी, वॉर्डबॉयनी आपल्याशी बोललं पाहिजे. आपलं दु:ख समजून घेतलं पाहिजे असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण ते शक्य होत नाही. त्यामुळे कधी कधी गरज नसतांनाही एकमेकांतले संबध ताणले जातात. आणि मग मारामार्‍यापर्यंत प्रकरणं येऊन पोचतात. याला आळा बसावा त्यासाठी अगदी ऑर्डबॉय, आया पासून ते डॉक्टरांपर्यंत आम्ही सॉफ्टस्किल डेव्हलप करण्याचा प्रोग्राम आयोजीत केला आहे. त्याचे परिणामही चांगले दिसताहेत.

लिखाणाची सवय कधीपासूनची...

पहिल्यापासूनच लिहितो. आजवर माझी छत्तीस पुस्तकं प्रकाशीत झाली आहेत. कधी व्यवसायाचा भाग म्हणून तर कधी मनातलं सांगावसं वाटलं म्हणून. लिहित असतो. आजही माझं काही वर्तमानपत्रात स्तंभलेख लिहिणं चालू असतं. लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. यातून लोकांशी थेट संवाद साधता येतो. लिहित राहणार आहे.

आजवरच्या सेवेत आपण समाधानी आहात? पुढची काय स्वप्नं आहेत?

हो नक्कीच... मला सरकारी नोकरीनं जे दिलं आहे ते खाजगी प्रॅक्टीस नक्कीच देऊ शकली नसती. आणि स्वप्नाचं बोलायचं झालं तर मला केईएम केइएमसारखं ठेवायचं आहे. जिथं जात, धर्म, राज्य, प्रदेश याच्या सिमा ओलांडून माणसं आपल्या बरेपणासाठी येतात. इथं येतांना त्यानी हक्कानं यावं. संगवरवरी फरश्यानां, रंगीबेरंगी भिंतीना, कडेकोट बंदोबस्ताला आणि थंडगार एसीच्या गारव्याला बघुन बुजता कामा नयेत. हा परिसर, इथला स्टाफ, इथली जमीन त्याना आपली वाटायला पाहिजे. आज वाटते तशी.


प्रवीण धोपट

99672 93550

pravindhopat@gmail.com

No comments: