Friday, July 2, 2010

सैनिकहो तुमच्यासाठी...

पुर्वप्रसिध्द्दी- मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा # संपादक- शिरीष पारकर # जुलै-२०१०


सैनीकांच्या आधी महाराष्ट्रात कार्यकर्ते रहात होते. महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांचं मोहळ ही ओळख महाराष्ट्र अनेक वर्ष अभिमानानं अंगाखांद्यावर खेळवत आला आहे. आजही कुणी तसं म्हटलं तर पुर्वीचा काळ आठवून माणूस भुतकाळात रमतो. गांधीवादी, समाजवादी, मार्क्सवादी विचारानं या कार्यकर्त्यांची फळी महाराष्ट्राला दिली. मंथन, मनन, चिंतन, वाचन, श्रवण हे शब्द नव्या परिमाणासकट कार्यकर्त्यांच्या रोमारोमात भिनायचे. कार्यकर्ता बोलायला लागला की त्याच्या शब्दाशब्दातून विचाराची एक एक लडी उलगडत जायची. 'आपण समाजाचं काही देणं लागतो' हे केवळ वाक्य नसायचं तर त्यासाठी माणसं आपल्या आयुष्याची आहुती द्यायचे. आपापल्या कुवतीप्रमाने जो तो समाजाला आपलं योगदान देण्यासाठी आतुरलेला असायचां. भारलेला असायचा.

त्या काळात नेताही आपली ओळख 'कार्यकर्ता' अशी करुन द्यायचा. तेव्हा तो आपला, आपल्यातलाच वाटायचा. आपल्यासारखेच त्याचे कपडे असायचे. आपल्यासारखंच त्याचं घर असायचं. असलीच तर आपल्यासारखीच त्याची नोकरी असायची. आपल्यासारखेच त्याचेही प्रश्न असायचे. आपलेपणावर वसलेली समाजाची व्यवस्था असायची. सामान्य कार्यकर्यांची दु:खं नेत्याला माहीत असायची आणि नेत्याच्या घरातला रुबाब कार्यकर्त्यालाही माहीत असायचा. नेत्याच्या साधेपणाची समाजात चर्चा असायची आणि कार्यकर्त्याच्या तडफेचं नेत्याला कौतुक असायचं.


शिवसेनेच्या जन्माबरोबर कार्यकर्ता मेला. त्याच्या जागी सैनीक आला. पण त्याच्या ठाई जुन्या कार्यकर्त्याचा आब, पोक्तपणा नव्हता आणि सैनीकाची शिस्तही नव्हती. शिष्ठाईची जागा हुल्लडपणानं घेतली. विचाराची जागा आदेशानं घेतली. विचार आचरणासाठी असतो आणि आदेश फक्त पाळण्यासाठी. विचारांच्या आचरणात भुतकाळाचं तारतम्य असतं आणि भविष्याचं भान असतं तर आदेश पाळण्यात निव्वळ वर्तमानाचं दडपण आणि अस्तीत्वाची भीती असते. या अस्तीत्वाच्या भीतीनं माणूस फक्त गांगरुन जातो. भेदरुन जातो.


शिवसेनेच्या जन्मापासून आजतागायत मराठी माणूस फक्त भेदरलेल्या अवस्थेत आहे. त्याला कसल्यातरी अनाठाई भीतीनं, चिंतेनं ग्रासलं आहे. ही भीती ही चींता कशाची आहे हे त्यालाही अजून कळलेलं नाही. आपण मराठी असल्याचा अभिमान वाटण्याऐवजी तो त्याचा न्युनगंड बनला. मराठी माणसाचं मराठीपण समजून घेण्यात मराठी माणूस कायम चुकत राहिला. त्याला फक्त सण-समारंभ साजरे करण्यात गुंतवून ठेवण्यात आलं. शिवाजी महाराजांचं नाव घ्यायला शिकवलं पण महाराजांची थोरवी शिकवली नाही. इतिहासाची पानं चाळून दाखवली पण वाचायला दिली नाहीत. वर्तमानातली तत्कालीक दु:ख दाखवली पण भविष्याचं स्वप्न दिलं नाहीत. त्यामुळे गेली चाळीस बेचाळीस वर्षे मराठी माणूस फक्त शाखेभोवती घुटमळत राहीला. न चुकता दसर्‍याला शिवाजी पार्कवर आणि वाढदिवसाला मातोश्रीवर हजेरी देत राहीला.


इंग्रजांच्या काळापासनच मुंबई ही एक व्यापारी पेठ आहे. इथे कुणासाठीही व्यापार- उदीमाची संधी सारखी आहे. हे दुर्दैव आता आपण मुकाटपणानं सोसतो आहोत. पण वडापावच्या गाडया, आणि झुणका भाकरीची केंद्र उभी करण्यापलिकडे शिवसेनेनं मराठी व्यावसाईकाला कोणतीही ताकद दिली नाही. शिवसेनेने व्यावसाइक तयार केले असतील तर ते फक्त कॉन्ट्रक्टर धर्तीचे. त्याना व्यावसाईकाच्या दॄष्टीपेक्षा मुकादमाची नजर दिली. नोकरीच्या लढयात त्याला जेवढं गुंतवून ठेवलं त्याच्याऐवजी जर त्याला व्यवसाय-धंद्याचेही धडे दिले असते तर आज पाचाचे पंचवीस झाले असते. त्यामुळे आज मराठी माणसाला आहे त्या परस्थीतीत मारुन-मुटकुन जगावे लागत आहे. नोकरी सांभाळण्याच्या कसरती करीत आयुष्यभर नोकरदार बनुन राहण्यापेक्षा तो आज मालक बनून ऐशोआरामात राहिला असता. तरीही जे मराठी व्यावसायीक म्हणून मोठे झालेले आहेत ते स्वतःच्या कष्टानं उभे राहिलेले दिसतात. पण त्यांचाही वर्गणीपलिकडे आणि सोविनिअरच्या जाहिराती पलिकडे यांनी कधी विचार किंवा वापर केला नाही. त्याचे भोग मराठी माणूस भोगतो आहे, भोगणार आहे. आज नोकर्‍यांची संधी नाही आणि भांडवलांची तजवीज नाही. त्यामुळे मराठी माणसाची 'ना घर का ना घाट का' अशी अवस्था आहे.

शिवसेनेच्या पाठीपुढे असलेला बहुसंख्य मराठी माणूस हा अर्धामुर्धा शिकलेला आहे. गावातून मुंबईत आलेला आहे. झोपडपट्टीत, चाळीतून राहणारा आहे. त्याला शिवसेनेचा आधार वाटणं हे स्वाभावीकच होतं. अर्थकारणाच्या लढाईत त्याला गोंजारणारं कुणीतरी हवंच होतं. या अर्ध्याकच्या मराठी माणसाच्या हातात कायमचं जगण्याचं हत्यार देण्यापेक्षा शिवसेनेनं त्यालाच आपलं हत्यार बनवलं. त्यामुळे मोर्चा असेल, बंद असेल, सभा असेल तेव्हा हाच मराठी माणूस व्यवस्थीत वापरला गेला. मोर्च्याला, सभेला, बंदला वेगळे आणि सेटींग, मांडवलीला वेगळे. त्यामुळे यातली काही मराठी माणसं कायमची मोठी झाली आणि उरली ती कायमसाठी आहे तिथंच राहीली.


महाराष्ट्रात गेली पन्नास वर्षे (मधली साडेचार वर्ष वगळता) सत्तेच्या मखमली खुर्चीवर काँग्रेसचं सरकार आहे. आणि लोकशाही शासन व्यवस्थेत कोणत्याही खुर्चीला सर्वसामान्याच्या दु:खापेक्षाही हितसंबधाचं राजकारण करण्यातच जास्त रस असतो. ते राजकारण खेळण्यात काँग्रेस पटाईत आहे. सर्वसामान्य माणसाच्या रोजच्या जगण्याशी कोणताही संबध नसतांना ते निवडणूकीच्या शर्यतीत कायम निवडून येतात यातच सारं येतं. आणि अशीच अवस्था राहिली तर कदाचीत यापुढेही हेच होत राहील. कोणतेही सरकार समाजाच्या विकासाचा विचार करीत नाही असे नाही. पण त्यात सर्वसमावेशकता असते. अमुक एक समाज त्यांच्या डोळ्यासमोर नसतो. त्यामुळंही सरकार मराठी माणसाचा विचार करीत नाही असं वाटत रहातं. आणि हे वाटत रहाणं अनेकदा गैरसमजातून अधीक गहीरं होत जातं. त्यामुळं वेळीच सत्तेचाही अर्थ शिवसेनेनं मराठी माणसाला समजून द्यायला हवा होता. ते ही ते करुन देण्यात चुकले. त्यामुळं १९९५ साली एकदा संधी दिल्यानंतर पुन्हा मराठी माणसांनी शिवसेनेला सत्तेत येऊ दिलं नाही. यापुढे येऊ देतील असं वाटत नाही.

शिवसेनेनं मराठी माणसाला मराठीचा गोजीरा गुलाबी गाजर दाखवून हिंदुत्वाचा कडवट सफेद मुळा हातात दिला तो भाजपमुळं. पण ती व्यापक सत्तेची निकड होती. ती काळाची गरज होती. हे समजावून सांगण्यात शिवसेना अपयशी ठरली. आणि टिकेची धनी झाली. आता आपली गरज संपल्याची भावना मराठी माणसात बळावत गेली. आणि शिवसेनाही सैरभर झाली. ते सैरभैरलेपण ना बाळासाहेबाना थोपवता आलं त्या त्यांच्या वारसांना. त्यामुळे शिवसेना आतून फुटत गेली. दुभंगत गेली. शिवसेनेतले काही महत्त्वाचे आधार दूर गेले हे त्याचे दृष्य परिणाम. पण शिवसेनेनं मराठी माणसाला वेळीचं शहाणं केलं नाही. श्रीमंत केलं नाही. सत्तेचं, बेरजेचं गणीत समजावून सांगीतलं नाही ही खरी मेख आहे.

बाळासाहेब आता वयानं थकले आहेत. त्यांच्या चित्तवृती अजुनही जाग्या आहेत, ताज्या आहेत. तोच करिश्मा आजही आहे. पण त्यालाही फक्त भावनांचा आधार आहे. आणि मराठी समाजात त्यांच्यासाठी दयेची, केविलपणाची झालर आहे. बाळासाहेबांच्या बोलण्यात पुर्वीच्या राजकारणाची, सत्तेची आग नक्कीच नाही. असूही शकत नाही. उध्दव ठाकरे उसनं अवसान आणतात पण अजुनही कठीण समय येता ते बाळासाहेबांच्या पाठीमागे लपतात. राऊत, जोशी, देसाई, नार्वेकर यांना आपल्याच जीवावर शिवसेना आहे असं वाटतं पण यांच्यावर मराठी माणसाचा विश्वास नाही. त्यामुळे आता असलेला मराठी माणूस फक्त पुर्वपुण्याईवर शिवसेनेच्या पायाजवळ बसला आहे. पण ही मृत्युसमयी रात्र जागवण्यासारखी स्थीती आहे. भविष्यात शिवसेनेत उरलेले काय दिवे लावणार हे कोणत्याही दिवशी कोणतंही चॅनेल पाहिल्यावर समजतं. कुठलंही वर्तमानपत्र काढलं की वाचता येतं. समाजात खाजगीत बोलल्यावर कळतं. मराठी माणसाचा कानोसा घेतल्यावर लक्षात येतं. वाईट याचं वाटतं की शिवसेनेचा अंत अश्या पध्दतीने व्हावा असं मराठी माणसाला नक्कीच आधी कधीच वाटत नव्हतं याचं. शिवसेनेचा मृत्यु समोर दिसतो आहे. हे मानायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.



प्रवीण धोपट
99672 93550

pravindhopat@gmail.com

1 comment:

मराठीसूची said...

agadi chan

Add it to marathisuchi http://www.marathisuchi.com - free marathi link sharing website and marathi blogs aggregator.

Once your website is added to marathisuchi then your posts will be automatically published on marathisuchi.com