Wednesday, January 27, 2010

शी...sss मराठी ?

पुर्वप्रसिध्द्दी- नवाकाळ # संपादक- जयश्री खाडीलकर-पांडे # जानेवारी-२०१०

संवादामध्ये 'साधणे' हा हेतू असतो. असायला पाहिजे. मग आपण काय साधतो ? तर एखाद्या भाजीवाल्याकडून एखादी भाजी आपण स्वतात मिळवतो. एखाद्याला पत्ता विचारुन आपण नेमक्या ठिकाणी पोचतो. कुणाला प्रश्न विचारतो किंवा कुणाला उत्तर सांगतो. यासाठी आपण काही सर्वमान्य साधनं वापरतो. हावभाव, अंगविक्षेप किंवा हातवारे यानेही गोष्टी साधता येत असल्या तरीही या साधनांपेक्षा 'भाषा' हे संवादाचं सर्वात प्रभावी माध्यम म्हणून आपण वापरतो. त्या साधनावरुन किंवा माध्यमावरुन सध्या महाराष्ट्र, मुंबई आणि मराठी माणूस यांच्या मनात काही प्रश्न आहेत. यातल्या काही प्रश्नांची उत्तरे त्याच्याच म्हणजे मराठी माणसाच्या हातात आहेत.
भाषा म्हणजे काय?
भाषा केवळ संवादासाठी वापरण्यात येत असती तर मग आपण यावरुन इतर भाषिकांशी भांडतो कशाला ? याचा अर्थ भाषा ही केवळ संवादाची भाषा नाही तर त्याचा संबध आपल्या रागलोभाशी आहे. अस्मितेशीही आहे. आपण कोण आहोत ? आपल्या परंपरा, आपली संस्कृती, आपला इतिहास, आपला भुगोल याचा संबध या भाषा नावाच्या गोष्टींशी असतो. आपली भाषा मराठी. मराठी भाषा म्हणजे ज्ञानेश्वर, तुकारामांपासून ते आजवर मराठी साहित्य, समाज, संस्कृतीच्या क्षेत्रात भर टाकणार्‍या महनीय व्यक्तींची आणि संस्थांची मांदीयाळी. त्यामुळे जेंव्हा या मांदीयाळीतील कोणत्याही एका घटकाचा अपमान व्हायला लागतो तेंव्हा तो आपल्या भाषेचा म्हणजे मराठीचा अपमान आहे असे आपण समजतो, आणि आपल्याला राग येतो. एका अर्थाने भाषेची जपणूक करणे म्हणजे अनेक अर्थाने या सार्‍याची जपणूक असा त्याचा अर्थ होतो.
आपण महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्राचा एक नकाशा आहे. महाराष्ट्राच्या काही परंपरा आहेत. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. इथे आपण रोजचे जगतो-वागतो, जे व्यवहार करतो त्यासाठी माध्यम म्हणून कोणती भाषा वापरतो? म्हणजे कोणती भाषा वापरायला पाहिजे? अर्थातच मराठी...! मातृभाषा म्हणून मराठी बद्दल जे प्रेम महाराष्ट्रीय माणसाला वाटेल ते परभाषिकाला वाटेलच असे नाही. तसे प्रेम त्याला त्याच्या मातृभाषेविषयी असेल. तरीही परप्रांतातून येणार्‍या प्रत्येकाला तिथल्या स्थानीक भाषेचा किमान आदर असायलाच पाहिजे.
भाषेचा अभिमान म्हणजे काय ?
एखादा अमराठी माणूस मराठी बोलतो त्याचं आपल्याला कौतुक वाटतं. तो त्याचं काम साधतो. जे भाषा या माध्यमाचा मुळ हेतू असतो. आपण मराठी आहोत, पण आपण मराठी बोलतो याचं कौतुक कोण करणार? तर कुणीच नाही. मग आपण सरळ इंग्रजी किंवा थेट हिंदीत सुरु होतो. आणि तिथुनच आपण आपल्याला फसवायला लागतो. एखादी भाषा अधिक प्रमाणात बोलल्यामुळे व्यवहारात त्या भाषेचा वावर वाढतो. भाषा ती त वाढत जाणार्‍या शब्दा शब्दातून समृध्द होत जाते. इतर भाषाही ती आपल्यात सामावून घ्यायला लागते. बोलण्यात, लिहिण्यात ज्या भाषेचा जेवढा जास्तीत जास्त वापर होईल तेवढं तिचं आयुष्य वाढण्याची शक्यता जास्त होते. जेंव्हा आजुबाजूची सर्वच माणसं संवादासाठी एकच एक भाषा वापरतात तेंव्हा त्या भाषेच्या एकजिनसीपणामुळे त्या समाजाचा व्यवहार अधिक सहज, साधा, सुखकर आणि सोपा होतो. मग इथे मराठी अमराठी, महाराष्ट्रीय नॉन- महाराष्ट्रीय हा मुद्दा उरत नाही. इथून पुढे संवाद शक्य असतो (यात भाषेचा प्रश्न सोपा होतो भाषिकांचा कठीण होत जातो)
संधी मिळेल तेंव्हा आपण इतर भाषा किंवा भाषिकांचे विष्लेशण करायला हरकत नाही. पण वेळ मिळेल तेंव्हा, आपण आपल्याला आपल्या भाषेबद्दल वाटणारं प्रेम तपासून पहायला पाहिजे. आज मुंबईत बेस्ट बसेस मध्ये कंडक्टर्स(वाहक) आणि मासळी बाजारात कोळणी या दोनच जमाती मागे पुढे न बघता थेट मराठीतून सुरुवात करतात. बाकी झाडून सगळे हिंदीत उतरतात. हिंदी भाषेला तिला म्हणून तिचं एक सौंदर्य आहेच. पण आपण जेंव्हा तिला आपल्या घाटी, कोकणी सुरात घोळवतो, तेंव्हा भाषा म्हणून तिचाही आपण कचराच केलेला असतो. आपली भाषा आपल्याच बोलीत गोड वाटते. संवादच साधायचा आहे ना, मग करा ना आपल्या भाषेत सुरुवात. समोरच्याला असेल अडचण तर तर तो सांगेल किंवा शिकेल. पण ती त्याची अडचण असुदे. तुम्ही कशाला आपल्या भाषेला अडचणीत टाकताय. कारण भाषेच्या बाबतीत असं आहे की जी भाषा वापरली जाते तीच टिकते आणि जी वापरली जात नाही ती संपते सुध्द्दा.
मराठी पालक इंग्रजी बालक
आपण आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालतो. ठीक आहे. ती काळाची गरज आहे असं आपण समजू. भाषेच्या आदराचाच प्रश्न आहे तर इंग्रजीचाही करु. पण इंग्रजी माध्यमात शिकणार्‍या मुलांचं कौतुक त्यांच्याच पालकांकडून ऐकतांना शिसारी येते. मुलं शाळेतच शिकतात असं नाही. कुटुंब, समाज, परिसर याच्याकडूनही ती शिकतच असतात. यातली अनेक मुलं रोजच्या व्यवहारातलं सुध्दा मराठी चुकीचं बोलतात. विशेषतः चुकीचे उच्चार करतात. करत राहतात, याला कारण त्यांच्या अश्या बोलण्याचं घरातुनच भारी कोडकौतूक केलं जातं. 'ट्वेल्व्ह ओ क्लॉक वाजले' यापेक्षा 'बारा वाजले' असं म्हणनं खरोखरच सोप आहे, तरी तसंच बोलतात. 'बाबा' ला 'पप्पा' किंवा 'डॅडी' म्हणतात 'आई' ला 'मम्मी' किंवा 'मॉम' म्हणतात. (आजीला आई म्हणण्याची फॅशन सध्या जोर धरते आहे) हे अश्यासाठी लिहिलंय की वाचतांना तरी कळेल, या शब्दांचे उच्चार मराठीत किती सोपे आहेत ते. या मुलांना 'टर्न' कळतं तर 'दीर्घ' कसं कळत नाही, हे समजणे कठीण जाते. प्रश्न असा आहे की प्रयत्नपुर्वक जिथं आपण दुसर्‍या भाषा शिकतो तिथं थोडयाश्या प्रयत्नात आपण आपली भाषा नीट वापरायला शिकण्यात काय हरकत आहे ?
ज्ञानेश्वरांची एखादी ओवी ऐका म्हणजे मराठी भाषेत किती गोडवा आहे हे जाणवेल. तुकारामांचा एखादा अभंग ऐका म्हणजे मराठी भाषा किती थेट आहे हे कळेल. गोविंदाग्रज, बालकवी, कुसुमाग्रज किंवा पाडगावकरांच्या कवितेच्या ओळी वाचा म्हणजे मराठी भाषेतलं सौदर्य कळेल. जे आपलं आहे ते बिनधास्त आपलं म्हणायला शिका.

प्रवीण धोपट
99672 93550
pravindhopat@gmail.com

विनाकष्ट जय महाराष्ट्र !

पुर्वप्रसिध्द्दी- नवाकाळ # संपादक- जयश्री खाडीलकर-पांडे # जानेवारी-२०१०

महाराष्ट्र म्हणजे काय. मराठी माणूस म्हणजे काय. या प्रश्नाचं उत्तर आपण द्यायला लागलो की, आपली भाषा, आपली संस्कृती, आपला इतिहास, आपल्या परंपरा आणि त्यातून जन्माला येणारी अस्मिता या सर्वांचा उल्लेख येणं स्वाभावीक असतं. अलिकडच्या काळात मराठी माणूस किंवा महाराष्ट्राची भाषा, संस्कृती, इतिहास आणि परंपरां याला एक विषेश महत्त्व आलेलं आहे.
खरंतर याच्या विकासासाठी राज्य भाषा विकास संस्था, सांस्कृतीक खातं, सरकारी गॅझेट, ईतिहास संशोधन मंडळ या राज्य सरकारकडून स्थापन झालेल्या संस्था आहेत. पण या त्यांची कामं प्रत्यक्ष व्यवहारात कुचकामी ठरलेली आहेत. यात समाजाचा सहभाग नाही, अंकुश नाही. एक सांस्कृतीक खातं सोडलं तर अनेकांना याची माहितीही नसते. त्यामुळेच मग सरकारबाह्य शक्ती यात हस्थक्षेप करतात. वेळप्रसंगी त्या आक्रमकही बनतात. पण त्यामुळे प्रश्न सुटत तर नाहीच पण तो आहे तिथंच राहतो, किंबहुना तो जास्तच चिघळतो.
भाषा, संस्कृती, अस्मितेचे प्रश्न फक्त भावनीकच असतात असे नाही त्यामागे अभ्यास, तारतम्य आणि विचारही असू शकतो, उत्तराच्या जागा कानाखालीच असतात असे नाही. सहकार्य आणि सहभागातूनही वाट काढता येऊ शकते, हे आता समजून घेण्याची गरज आहे. तरीही या निमित्ताने समाजात झालेली घुसळण फार महत्त्वाची आहे. या प्रश्नातलं राजकारण बाजूला करुन त्यासाठी चिकाटीनं काम करण्याची गरज त्या त्या क्षेत्रातल्या धुरीणांची असते. केवळ राजकारण करणार्‍या माणसांच्या नावानं बोटं मोडूनही असे प्रश्न सुटणार नाही. तरीही अश्या प्रकारच्या प्रश्नांसाठीची लढाई जर केवळ प्रतिक्रीयात्मकच राहीली तर भाषेचा प्रश्न अधिकच चिवट आणि किचकट बनत जाणार. भावनेचा भर लवकर ओसरतो. अश्या प्रश्नावर घटनात्मक आणि मराठी माणसाच्या मुळ मानसिकतेत बदल करणारे उपायच आवश्यक आहेत. परंतू दुर्दैवाने असे उपाय होतांना दिसत नाहीत.
या लेखाच्या निमित्ताने मी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांना आणि त्यांच्या अनुयायीना काही मुलभूत प्रश्न विचारले. ज्यांना महाराष्ट्राच्या अस्मितेविषयी अभिमान आहे. त्यासाठी ते आपल्या प्राणांचीही बाजी लाऊ शकतात. (अर्थातच यासाठी कुणाचे प्राणही घेऊ शकतात)
महाराष्ट्राच्या अस्मितेच्या मापदंडातलं मानाचं पहिलं पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या जन्मतीथी आणि पुण्यतिथी विषयी जवळजवळ अनेकांना माहित नव्हतं. (एक शिवसेनेची आणि एक कॉग्रेसची एवढंच माहिती आहे) महाराजानी लढलेल्या लढाया, जिंकलेले गड- किल्ले याविषयी तर आलबेल आहे. वस्तुनिष्ठ माहितीपेक्षा मोघम इतिहास तोंडपाठ, अशी अवस्था. इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पुस्तका पलिकडच्या ज्ञानात नंतर एक टक्क्याचीही भर पडलेली नाही. फक्त ...जय भवानी म्हटलं की ...जय शिवाजी म्हणायचं एवढंच.
यातल्या राज्यकर्त्यांना शिवाजी महाराज्यांचं अष्टप्रधानमंडळ तरी माहीत असायला पाहिजे होते. पण तेही नाही. तेव्हाचं अष्टप्रधानमंडळ म्हणजे एकप्रकारे आत्ताचं कॅबिनेट मंत्रीमंडळ्च. कोण कुणाचा समर्थक, कोण कुणाचा नातेवाईक, कोण कुणाचा जावई, कोण कुणाचा भाऊबंद. एवढाच महाराजांचा त्यामागे निकष होता की आणखी काय, हे अष्टप्रधान मंडळ त्याचे प्रमुख आणि त्यांची कामं यावर जरी साधी नजर फिरवली तरी बरच शिक्षण झालं असतं. शिवाजी महाराज राज्यकर्ते म्हणून का आणि किती थोर होते याची उत्तरे यात मिळाली असती. आज तीन शतकानंतरही त्यांची थोरवी आपण का गातो हे कळलं असतं. पण एखादी गोष्ट फुकट वापरायला मिळाली की त्याची किंमत नसते असंच म्हणायला पाहिजे. महाराज्याचं नाव घ्यायला टॅक्स लागला असता तर कदाचीत त्यांची थोरवी यांना चांगल्याप्रकारे समजली असती.
पुढचा प्रश्न होता मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मिती संबधातला. हे वर्ष सुवर्णमहोत्सवी आहे म्हणून त्याला महत्त्व. नाही तर काय? त्या लढयात कामी आलेल्या १०५ (खरंतर १०६) हुतात्म्यांपैकी पाच जणांची तरी नावं सांगा म्हटलं तर त्यातल्या एकालाही एकही नाव सांगता आलेलं नाही. ज्या हुतात्म्यांच्या नावानं आपण शपथ घालतो, राजकारण करतो त्यांची नावंही आपल्याला महित असु नये यासारखा दुसरा कृतघ्नपणा नाही.
या प्रश्नाचा आता तसा व्यवहारात उपयोग नसला तरीही विचारलं की, मराठी महिन्यांची नावं सांगा. या वेळी बहुतेक बाराच असावेत याविषयी एकमत होतं, पण वाढीव महिना म्हणजे काय याविषयी गोंधळ होताच. काही सन्माननीय अपवाद वगळता अनेकांना बारा महिन्यांची सलग नावं सांगता आलेली नाहीत.
एखदा माणूस सरपंच झाला की त्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनल्याचं स्वप्न पडायला लागतं. पण ज्या राज्याचा पुढे आपल्याला प्रमुख बनायचे आहे, त्या राज्याचे एकुण जिल्हे किती विचारले तर ते एकालाही सांगता आलेलं नाही.
हे झालं नेत्यांचं. ते काम करुन करुन थकतात. ते वाचणार कधी? काही नेते फक्त आपल्यावरची टीका तेवढीच वाचत असावेत. पण या सर्व गोष्टींचा अभिमान आपल्यालाही असतो. आपणही महाराष्ट्रीय किंवा मराठी असतो. मग आपल्याला तरी हे माहीत आहे का? असा प्रश्न आपल्यालाही आपण विचारायला हवा. आपण महाराष्ट्रीय किंवा मराठी आहोत हे फक्त म्हणण्यापेक्षा ते चाचपून पहायला हवं.
महाराष्ट्राच्या गौरवाची, अभिमानाची जी प्रतीकं आपण वापरतो त्याची साधी ओळखही आपल्याला करुन घ्यावीशी वाटत नाही. हे युग माहीतीचं आहे. ज्ञानाचे दरवाजे सर्वांसाठी सताड उघडे आहेत. आपल्याला वाचता येतं, बघता येतं. मग प्रश्न हा उरतो की घोडं अडतं कुठं ? श्रध्दा डोळस असायला काय हरकत आहे ? कोणतेही कष्ट न घेता नुसतं जय महाराष्ट्र म्हणायचं हे किती दिवस चालायचं ?

प्रवीण धोपट
99672 93550
pravindhopat@gmail.com