Monday, July 19, 2010

तू भिजत रहा

पुर्वप्रसिध्द्दी- मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा # संपादक - शिरीष पारकर # जुलै-२०१०

अन्यतः नकाशे बनवण्याची कटकट वाढलीच असती. पुन्हा गेली पन्नास वर्षे नजरेत भरलेला किंवा बसलेला आकार बिघडला असता ते आणि निराळंच. वर फटाक्यांचा, बॅनरवरचा आपला खर्च वाचला तो वाचलाच ना? (...नाही ...नाही, रांगोळ्या वैगेरे आत्ता नाहीत, पुढच्या वर्षापासून. त्याला आधीपासनंच तयारी करायला लागते.) त्यामुळे एका अर्थानं झालं ते बरं झालं. जर तर चा खेळ नेहमी हरण्यातच मजा असते. कारण हारलेल्याचा सल नेहमी माणसाच्या आशा आकांक्षाना अधिक उर्जा पुरवीत राहतो. विजयाचा आनंद एकदाच किंवा वर्षावर्षानं आठवत राहिला असता एवढंच. एक मे ला कंपनी म्हणून आणखी एक दिवस. त्यावरुन पुन्हा भांडणं किंवा सुवर्णमध्य. मग पुन्हा (शिवाजी महाराज जयंती स्टाईल) शिवसेना, मनसे, भाजपा यांची सुटटी एक मे आणि कॉग्रेस, राष्ट्रवादी म्हणजे सरकारी हॉलीडे 7 जुलै. थोडक्यात बेळगावने महाराष्ट्रात येण्याचा मुहुर्त तुर्तास टळला आहे. हे बरंच झालं.

पण एक ना एक दिवस बेळगाव महाराष्ट्रात येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. हे केंद्रालाही माहीत असणार. तिथंली बहुसंख्य जनता मराठी आहे. अगदी आकडेवारीतच बोलायंचं झालं तर ५४.७ % मराठी तर कन्नड भाषिक २३.८ % आणि इतर उरलेले. बेळगावचा मराठी भाग ऐतिहासिक, भाषिक, वाडमयीन, धार्मीक अंगाने महाराष्ट्रीयन आहे. ज्योतिबा, खंडोबा, विठोबा, तुळजाभवानी ही त्यांच्या श्रद्धेची ठिकाणं आहेत. या शहरात एकुण दहा वाचनालयं आहेत. त्यापैकी सात पुर्णपणे मराठी. दोन द्विभाषिक तर एक कन्नड. बहुसंख्य शाळांचे माध्यम मराठी. उर्दु भाषिकांची दुसरी भाषा मराठी. १ डिसेंबर १८९१ साली पंच कमिटी म्हणून स्थापन झालेल्या आणि आता महानगर पालिकेत रुपांतर झालेल्या बेळगाव शहरातील या १३५ वर्षे जुन्या संस्थेचा कारभारही पुर्णपणे मराठीतूनच होत आला आहे. पण पुढे महाजन समितीनेही या मुद्यांकडे सोईस्कररित्या दुर्लक्ष करुन महाराष्ट्राच्या विरोधीच सुर लावला. ते या ठिकाणी इतरत्र देत असलेल्या तक्त्यातूनही लक्षात येईल.

तालूका                         गावे                        भाषिक टक्केवारी


                                                        मराठी                कानडी            इतर

बेळगाव शहर               ...                ५२.००                २३.००             २५.००

बेळगाव तालूका           ९                  ९६.१६                  ...                   ...

अथणी                         १०                 ६१.००                  ३३.००             ६.००

खानापूर                      ५०                ८६.७०                 ...                   ...

कारवार                       ५०                ७८.००                १५.००             ७.००

सुपा                           १३१                ८४.००                   ६.००            १०.००

हल्याळ                      १२०                 ६२.००                 ३२.००              ६.००

हुमनाबाद                  २८                   ६३.००                  १६.००            २१.००

भालकी                      ४९                 ५९.००                  ३०.००            ११.००

संतपूर                       ६२                  ६०.००                  २६.००            १४.००

आळंद                       १०                   ६८.००                  २४.००             ८.००

त्या जनतेला महाराष्ट्रात येण्याची आस आहे. बेळगावातल्या 'महाराष्ट्र एकीकरण समिती' नावाच्या पक्षाचे चार-सहा आमदारही निवडून येतात. अपवाद गेल्या निवडणूकीचा त्याची कारणंही आता आपल्या सगळ्यांना माहिती झाली आहेत. तिथल्या महानगरपालिकेतले बहुसंख्य नगरसेवक मराठी असतात. किंबहुना १९८४ सालापासून आजपर्यंतचे १९ महापौर मराठीच आहेत. आपल्याला माहित आहे, महाराष्ट्र आणि कर्नाटक ही राज्य वेगवेगळी असली तरी त्यांचा देश एकच आहे. म्ह्टला तर प्रश्न चुटकीसारखा सुटू शकतो. पण तरीही तो भिजत ठेवलेला आहे. आणि तो भिजत राहण्यातच खरी गंम्मत आहे. लोकशाहीत खरंतर लोकभावनाच प्रबळ ठरायला हवी. तरीही बेळगावचा प्रश्न सुटत नाही. त्याला उत्तरोत्तर आणखीनच पेच पडताहेत. हे खरंच अनाकलनीय आहे.


इथे एक गोष्ट आपण समजून घ्यायला हवी ती म्हणजे, सिमाभाग हा प्रश्न इतिहासाचा आहे, भुगोलाचा आहे अर्थात भावनेचाच आहे. आणि काँग्रेसला त्यांच्या विरोधकांना फक्त भावनांचे खेळ खेळायला द्यायचे आहेत. भावनेच्या खेळात सामील होणार्‍यांचं शेवटी हसंच होतं. गेली पन्नास वर्षे महाराष्ट्रात हा खेळ चालला आहे. या पुढेही चालणार आहे. त्यामुळे काँग्रेस सहजासहजी बेळगाव महाराष्ट्रात सामील करण्याच्या भावनेला भीक घालणार नाही, हे नक्की.

बेळगाव, निपाणी, खानापूर,कारवार, बीदर, भालकी असा मराठी बहुभाषिक सिमाभाग महाराष्ट्राला न देता तो गेली ५० वर्षे हा विषय कुजत ठेवण्यात काँग्रेस यशस्वी झाली आहे. १ नोव्हेंबर १९५६ रोजी केंद्राने हा मराठमोळा भाग मैसूरच्या (कर्नाटक) घश्यात ढकलला होता. भाषावार प्रांतरचनेचे नियम धाब्यावर बसवले गेले. असं करण्यामागे कोणतेही निकष नव्हते. असलेच तर ते महाराष्ट्र द्वेशाचे. खरंतर याच बेळगावात १९४६ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलनाच्या निमित्तानेच संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलं गेलं होतं. पण अजून झोप उडाली नसल्यामुळे स्वप्नही तशीच आहेत.

गुजरात राज्याची निर्मीती करतांनाही खुद्दा बाळासाहेब खेर, मोरारजी देसाई यांनी डांगी भाषा मराठीला जवळची आहे असा अहवाल दिला होता. तरीही लोकल बोर्डाच्या ठरावावर डांग आणि उंबरगाव हा भाग गुजरात मध्ये घालण्यात आला. तेही घोंगडं अजून भिजतंच आहे. उपरवालेके घर मे देर है अंधेर नही असं आपण म्हणतो किंवा मानतो. सर्व पक्षांनी आपली सर्व शक्ती एकवटून 'जोर लगा के...' म्हणत शेवटचा टोला हाणला, सर्व बळ पणाला लावून एक जोराचा धक्का दिला तर बेळगावचा सीमाप्रश्न धक्क्याला लागू शकतो.

बेळगावची जनता दुरदैवाने कर्नाटकासोबत नांदत असली तरी तिचं प्रेम महाराष्ट्रावर आहे. खरंतर ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याशीच लग्न करायला मिळावं असं वाटतंच. वाटायलाच पाहिजे. पण तसं न होण्यातही एक गंम्मत असते. ती हुरहुर आयुष्यभर तरी जपता येते. लग्नानंतरच्या नवलाईचे नऊ दिवस संपले की प्रेम, लग्न, संसार या मार्गाने पुढे सरकलेला गाडा नंतर आयुष्यभर ओढत रहावा लागतो. मग 'याच साठी केला होता का अटटाहास?' असं म्हणण्याची पाळी येते. पण नाईलाजाने का होईना वडीलधार्‍याच्या शब्दाला मान म्हणून आपल्याला न आवडणार्‍या माणसाशीही संसार करावा लागतो. तो जर प्रमाणीकपणानं केला तर पुढे बर्‍याच वेळेला (म्हणजे अश्या प्रकारच्या सगळ्याच सिनेमात) एका पावसात प्रियकराची भेट होते. याची बायको आणि तिचा नवराही अकाली गेलेला असतो. भुतकाळातल्या रम्य आठवणी निघतात. नियतीचे आभार मानले जातात. फुलं फुललेलीच असतात. झरे झुळझुळत असतात. वारे वहात असतात. पक्षी गात असतात. वासरं बागडत असतात. मुलं नाचत असतात. झाडं-वेली डोलत असतात. त्याच वेळी यांनी त्यावेळी गायलेलं गाणं बॅगराउंडला पुन्हा वाजत असतं आणि द एंड. तसं विरोधकांचं राज्य येवो अशी कार्नाटकी विठोबाला आपण प्रार्थना करुया. तेवढीच आपली गंम्मत. गेली हजारो वर्षे कानडा असुनही विठोबाला आपण आपला मानला. आता आपल्याला माहितच आहे की बेळगाव आपलाच आहे पण त्याना काही वर्षे त्याला आपला मानु दे. कारण आपल्यापेक्षा इतिहास, भुगोल आणि परमेश्वराचंही वय जरा जास्तच असतं, नाही का?



प्रवीण धोपट
99672 93550

pravindhopat@gmail.com

No comments: