Sunday, May 23, 2010

तुंबलेल्या तुतार्‍या

पुर्वप्रसिध्द्दी- मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा # संपादक- शिरीष पारकर # मे-२०१०


अगदी आठवडयाच्या अंतरावर एक मे येऊन ठेपला (इथे मराठी माणसाने उभा ठाकला आहे असे वाचावे) आहे. मुंबईसह महाराष्ट्र राज्याच्या निर्मीतीचा हा पन्नासावा वाढदिवस. पन्नासाव्या वाढदिवसाला सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणतात. पुन्हा अशी पन्नास वर्ष कधीच येणार नाहीत. नंतर एकदम साठ, पंच्याहत्तर आणि शंभर. मग त्यानंतर ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे किंवा गरजेप्रमाणे साजरा होईल तेव्हा होईल . त्यामुळे आत्ताच महाराष्ट्राच्या परंपरेला साजेश्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे. ढोल ताश्यांच्या वाद्या ओढल्या जात आहेत. रात्री अपरात्री लेझीमची तालीम सुरु आहे. बँजो पार्ट्या आधूनीक ढिंग्चँग गाण्यांची प्रॅक्टीस करताहेत. डिजेवाले रिमिक्स गाण्यांच्या सिडीज गोळा करत आहेत. पताका कापायचा त्रास नको म्हणून चायनीस बल्बच्या झिगझॅग माळा बिल्डींगीवर, गच्चीत, खिडक्यात, झाडां-झुडपांवर सोडल्या जात आहेत. एकूणच महाराष्ट्राच्या मातीत आणि मराठी माणसाच्या छातीत उत्साहाला उधाण आले आहे.
यावेळी खरंतर शोभायात्रेला हत्तीच हवे होते. अंबारीतून संत ज्ञानेश्वर, तूकाराम-रामदास, शिवाजी महाराज आणि शक्य झाल्यास अत्रे, डांगे, एसेम, बापट,अमरशेख यांचे फोटो. बाजूला स्वच्छ -सफेद कपडयात स्थानीक नगरसेवक किंवा आमदार खासदार यांची मिरवणूक करण्याचे घाटत होते. पण हत्ती बजेटच्या बाहेर म्हणून कॅटरर्स कडून घोडे, खेचर आणि बैल यांची व्यवस्था लावण्यात कार्यकर्ते गुंतले आहेत. घोडयांचे, बैलांचे मालक भैयाच असतात. त्यांना मराठीतूनच बोलण्याच्या विषेश सुचना देण्यात आल्या आहेत. फटाके, ढोल-ताशे-लेझीम या न बुजण्यार्‍या धीट प्राण्यांची निवड केली जात आहे. शोभायात्रेचे मार्ग आखण्यात येत आहेत. बैलगाडी किंवा ट्रकावर उभे करण्यासाठी देखावे तयार केले जात आहेत. त्यालाच चित्ररथ म्हणण्याची परंपरा आहे. पोरांना दाढया-मिशा लावून मावळ्यांच्या वेशात उभे कसे रहावे याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. तरीही मुले कंटाळतातच म्हणून त्यांच्यासाठी विषेश वडापाव आणि थंडा याची सोय लावण्यात आली आहे. यात भाग घेणार्‍या मुलांच्या पालकांनीच आपापला खर्च करायचा आहे. शक्यतो मावळ्यानी गॉगल वैगेरे वापरु नये याची काळजी घेतली जाईलच. पण उन्हाचा कहर लक्षात घेता असे नियम शिथील केले जातील. नागरीकांसाठी पिंप भरभरून लिंबू किंवा रसना सरबत फूकट वाटण्यात येणार आहेत.




तुतार्‍या वाजवून वाजवून काही जणांचे गाल फाटून गेले आहेत. त्यामुळे या धंद्यात आता फारसे लोक नाहीत. आणि पेमेंट वेळेवर मिळत नसल्याने नवीनही पिढी तयार होत नाही. तरीही या दिवसाचे विषेश महत्व लक्षात घेता स्पिकरवरच रेडिमेड तुतारीची धून वाजवण्याची व्यवस्था केली आहे. स्टेजवर सर्व प्रमुख पाहुणे बसेपर्यंत आणि शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याला हार घाले पर्यंत ती कितीही वेळेला रिपिट वाजवता येईल. यावेळी या दिवशी स्पिकरवर फक्त मराठमोळी गाणी (विशेषतः महाराष्ट्र गीते, भक्तीगीते वैगेरे) वाजवण्यावर भर असेल. तरीही तरुण सळसळत्या रक्ताचा हिरमोड नको म्हणून काही रिमिक्स गाण्यांचा शिडकावा अधून मधून करण्यात येईलच याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. काही मंडळानी खास मराठीचा अभिमान सांगणार्‍या ओळींचे टीशर्टस छापून घेतले आहेत. त्या टिशर्ट्सच्या मागे स्पॉन्सरर स्थानीक आमदार-नगरसेवकाचे सौजन्य म्हणून नाव छापले जाणार आहे.



शोभायात्रेत सहभागी होणार्‍या पुरुषांना झब्बे, लेंगे,फेटे कम्पल्सरी केले आहेत. ब्रेसलेट्स, चैनी, चामडयाच्या पांढर्‍या चपला, मोजडी अश्या वस्तूंचे खास आपापल्या स्तरावर प्रदर्शन करावे अश्या सुचना आहेत. लहान मुलांसाठी रेडीमेड धोतरे, फेटे किंवा रिबीनींची सोय करण्यात त्यांचे त्यांचे आई बाबा (स्वारी...मम्मी-पप्पा) गुंतले आहेत. ठिकठिकाणी रस्त्यावर रांगोळ्यां काढण्यात येणार आहेत, गेटवर झावळ्या तोरणे लावण्यात येणार आहेत. सत्यनारायणाची पुजा असणारच. त्यासाठी नवदांपत्याची, भटजींची शोधाशोध सुरु आहे.



आपापल्या एरियात जबरदस्तीची रक्तदान शिबीरे, मोफत चश्मा शिबीरे, मोफत वह्या वाटपाचे समाजीक कार्य करण्याचे योजीले आहे. त्यासाठी आगाऊ नावनोंदणी सूरु आहे. यानिमित्ताने दहावी-बारावीत पहिल्या आलेल्या मुलांचे कौतूक खास पेंसिल बॉक्स आणि गुलाबपुष्प देऊन करण्यात येणार आहे. याच ठिकाणी नापास झालेल्या मुलांना धीर देण्यासाठी अपयश हीच यशाची पहिली पायरी कशी आहे याची सोदाहरण माहीती देण्यात येणार आहे. बाकी खेळ, चित्रकला किंवा तत्सम प्रावीण्य मिळवलेल्या मुलांचेही कौतूक करण्यात येणार आहे. जेष्ट नागरीकांचा (उगाचच) शाल देऊन सत्कार करण्यात येणार आहे.



खास ओवाळणी साठीच्या बाया नऊवारी साडयांवर मॅचींग सेट्स शोधण्यात गर्क आहेत. कपाळावरची चंद्रकोर, नथ, आंबाडा, हिरवा चुडा वैगेरे मराठमोळा साज. भरीला मेहंदी, फेशीअल, ल्बीचींग, आयब्रो आणि खिडूकमिडूक मेकअपचे सामान जुळवण्यात त्या मग्न आहेत. आयत्या वेळेला गजरे आणायचे कुणी, कुणाला ओवाळायचे कुणी, पदर डोक्यावरुन घ्यावा की खांद्यापर्यंतच बस याचे जोरदार प्लॅनींग सुरु आहे. त्यात ओवाळणीचे फोटो काढायचे कुणी याचीही आखणी चालू आहे. हल्ली डिजीटल कॅमेरा मुळे रोल भरण्याचा ताप नसतो. तरीही मशीनचा काय भरवसा म्हणून जोडीला मोबाईल्स सुध्दा तयार ठेवले जात आहेत.



शिवाजी महाराजांचे पुतळे पुसले- धुतले जात आहेत, गरज भासल्यास रंगवले, मागवले जात आहेत. महाराजांसाठी चंदनाच्या पर्मनंट हारांची ऑर्डर गेली आहे, आणि तो हार गळ्यात टिकावा म्हणून महाराज्यांच्या खांद्यावर खिळे ठोकले जात आहेत. आपापला एक पुतळा असावा यासाठी सगळीच मंडळे प्रयत्नशील असतात, तरीही तो आयत्यावेळी कुठे मिळतो याची कार्यकर्त्यांना पक्की माहीती असते. (काही लोकांना पुतळे, तलवारी, ढाली यांचीच गीफ्ट्स येत असतात) तशी चौकशी चालू आहे. तरीही प्रत्येकजण प्रत्येक पायरीवर खात्री करुन घेतो आहे. कारण यावेळी सगळं असलं आणि एकटे महाराज नसले तर सगळ्या कार्यक्रमाचा विचका होऊ शकतो. याची मराठी माणसाला जाण आहे.



काल-परवापर्यंत अनेकांना माहीत नसलेला हा दिवस उद्या एकदम दैदिप्यमान प्रकाशात न्हाऊन निघणार आहे. या निमित्ताने मेलेल्या एकशे सहा माणसांचे स्मरण केले जाईल. त्या लढ्यात मेलेल्या माणसांपैकी कुणाचेही नाव कुणालाच माहीत नसते. फक्त मेले ते एकशे पाच की सहा येवढयाच माहीतीवर सभा गाजवल्या जातील. मेलेल्यांच्या नावानं शपथा घातल्या जातील. अत्रेंचे चार-दोन किस्से सांगून, स.का.पाटील, मोरारजीना शिव्या घालून दिवस पार पडेल. मराठी माणसांची कानशिले जरा गरम होतील. हाता- पायात झिणझिण्या येतील. जरा या निमित्ताने तुंबलेल्या तुतार्‍या मोकळ्या होतील.



सकाळी उठल्यावर (किंवा उतरल्यावर) मराठी माणूस गुलालाने माखलेल्या झब्या-लेंग्याकडे, विस्कटलेल्या रांगोळ्यांकडे, मलूल झालेल्या फुलांच्या माळांकडे, लटकलेल्या तोरणांकडे, निपचित चिकचिकत असलेल्या चायनीज बल्बकडे पहात मनातल्या मनात म्हणेल, अरे याचा काय संबध? महाराष्ट्र पन्नास वर्षाचा झाला म्हणजे किती खर्च झाला ...!!!



प्रवीण धोपट
99672 93550
pravindhopat@gmail.com

No comments: