Monday, June 14, 2010

अंदाज म्हणाला चुकलो...!!!

पुर्वप्रसिध्द्दी- मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा # संपादक- शिरीष पारकर # जून-२०१०


अंदाज हा माणसाच्या जगण्याचा अविभाज्य घटक आहे. माणसाच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्नं याना धीर देण्याचं काम अंदाज करतो. अंदाजावर आंधळा चालतो, शेतकरी धान्य पेरतो, व्यावसाईक पैसा फेकतो, जुगारी बोली लावतो आणि सर्वसामान्य माणूस आपलं आयुष्य ढकलत असतो. अंदाजाच्या आधारावर माणसाचं सगळं जगणं उभ असतं. माणसाच्या भविष्यातील प्रत्येक कृतीचा आधार पुन्हा अंदाजच असतो. अंदाजाशिवाय माणूस शुन्य आहे. अंदाजानं चुकू नये नेहमीच बरोबर आणि वेळेवर यावं असं आपल्याला वाटतं ते याचसाठी.



अंदाज हा काही हवेत बांधायचा इमला नव्हे. त्याला काही घटनांची, संदर्भांची साथ असते. इतिहासाची जोड असते. आणि एकाच घटनेविषयी जेव्हा एकापेक्षा अनेकजण एकाच पातळीवर येऊन एकसारखा अंदाज व्यक्त करतात तेव्हा त्याला एका अर्थानं समाजाची मान्यता असते. अणि अनेक अर्थानं तो अंदाज ती त्या समाजाची मागणीही असते.



हे अशासाठी, की याआधी प्रत्येक वेळी मराठी माणसाचा अंदाज चुकला आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मीतीची प्रक्रीया इतकी जिवंत होती की त्यावेळी वाटले होते. आता मराठी माणसाचे, मराठी भाषेचे राज्य येणार आणि मराठी माणसाचे भले होणार. त्याला कारणेही तशीच होती. संयुक्त महाराष्ट्राच्या लढयातील नेते खर्‍या अर्थाने सर्वसामान्यांचे प्रतिनीधी होते. एस.एम., डांगे, ठाकरे, अत्रे या नेत्यांचे आर्थीक, सामाजीक, सांस्कृतीक जीवन सर्वसामान्याच्याच पंक्तीतले होते, सर्वसामान्य माणसाच्या घरातल्या अडचणी त्यांच्याही घरात होत्या. त्यांच्या व्यक्त्तीगत इच्छा आकांक्षा कवडीमोलाच्या होत्या. सार्वजनीक जीवन उघडया पुस्तकासारखे होते.



मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला तर मराठी माणसाचं नक्की भलं होणार असा अंदाज होता. लढयाचं सुत्रही तेच होतं. १ मे १९६० साली संयुक्त महाराष्ट्र जन्माला आला. पण त्यामुळे मराठी माणसाच्या आयुष्यात काहीही बदल झाला नाही. मुंबईचा भुगोल आहे तसाच राहिला. इतिहासाच्या पानात संयुक्त महाराष्ट्राच्या लढयाची नोंद झाली. नागरीक शास्त्र नेहमीच काळानुरुप आपलं स्वरुप बदलत राहतं. फक्त यानिमित्ताने मराठी माणसाला साजरा करायला आणखी एक दिवस मिळाला इतकंच. लढयातले नेते वयानं थकले. काही गेले. सगळेच संदर्भ बदलले. सर्वसामान्य माणसाचा चेहरा फक्त लढतानाच दिसतो. इतरवेळी तो आपल्या पोटापाण्याच्या, घरादाराच्या व्यापात असतो. तसं यावे़ळीही झालं. पुढचे चालक-वाहक बदलले. त्यांनी आपले मार्ग आपल्या सोईनुसार बदलून घेतले. खादी-कुर्त्यातलं, फाटक्या चपलेतलं समाजकारण मागे पडलं. धोतरांचं, सफेद कपडयातलं, गांधी टोपीचं राजकारण सुरु झालं. सत्तेच्या राजकारणात मराठी माणसाचं भलं करायचं राहुन गेलं. यावेळीही अंदाज चुकला.



पुढे १९६६ साली शिवसेना जन्माला आली. मराठी माणसाला पुन्हा हुरुप आला. आता आपलं नक्की भलं होणार असं वाटलं. आपले रोजगार चोरतात म्हणून दाक्षिणात्यांवर राग निघाला. काही प्रमाणात मराठी माणसाला नोकर्‍या मिळाल्या. वडापावच्या गाडया, झुणका भाकर केंद्र, वर्गणी, वसुली असे छुटुरफुटुर धंदे सुरु झाले. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेनं मराठी माणसाला सत्तेचं स्वप्नही दाखवलं आणि विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसच्या राजकारणाला मोठा धक्का दिला. शिवसेनेची आंदोलनं, सार्वजनीक बंद मुंबईच्या, महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही लक्षात रहावी अशी झाली. तळागाळात शाखांचा वचक वाढला. कपाळावर केशरी टिळा, वाढलेल्या दाढया-मिश्या, सफेद चपला, सफेद कडक सफारी, क्रमाक्रमानं मोटारसायकली, चार चाकी गाडया, मनगटावर सोनेरी सैलसर घडयाळ, ब्रेसलेट, बोटात चार-सहा अंगठया, गळ्यात दोन-चार चैनी त्याला लटकवलेली वागनखं (यानीच वाघ संपवले असतील काय?), मागेपुढे आठ-दहा चेले-चमचे, तोंडात आवाज कुणाचा आणि गरजेला....जय भवानी-जय शिवाजी.



१९९५ साली भगवा झेंडा विधानसभेवर फडकला. नंतर मराठी सोडून हिंदु सुरु झालं. साडेचार वर्षांच्या सत्तेनं यांना पार बिघडवलं. काही जणांच्या पुढच्या पिढयांची सोय झाली. पण यात मराठी माणसाची कुतरओढ झाली. सत्तेत गेले ते काय बोलून गेले ते विसरले. त्यामुळे मराठी माणसानी त्यांची जागा त्याना दाखवली. यापुढे पुन्हा सत्तेत दिसलात तर याद राखा कामा अशी सक्त ताकीदच मराठी सांनी शिवसेनेला दिली आहे, असे वाटते. शिवसेना नावाचा विश्वास तुटला. मराठी माणसाचा पुन्हा एकदा अंदाज चुकला.



आता याच मराठी माणसाच्या खांद्यावर मदार आहे ती राज ठाकरे यांची. किंवा हेच वाक्य उलट करुनही वाचता येईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निमित्ताने मरगळलेला मराठी माणूस पुन्हा एकदा जागा झाला आहे. त्यामुळे जे शिवसेनेला द्यायला अनेक वर्ष लावली ती सत्ता किंवा सत्तेचा काही हिस्सा मराठी माणसानं मनसेच्या हातात पदार्पणातच दिला आहे. मराठी माणसानं ही घाई अश्यासाठी केली असावी की त्याला माहित आहे की आता फारच उशीर झाला आहे. आणि कदाचीत ही शेवटची संधी आहे.



मुंबईत माझं माझं म्हणावं असं मराठी माणसाच्या हातात आता फार कमी शिल्लक आहे. आशा लावावी असं एकच नाव आहे ते म्हणजे राज ठाकरे. त्यामुळे जे उरलं आहे ते टिकवण्यासाठी तुमचाच आधार आहे. गोरगरीब, सर्वसामान्य माणसाबरोबर तरुण, शिक्षित असा एक मोठा वर्ग आपल्या पाठीशी उभा राहतो आहे. तुम्ही काय बोलता, काय करता याकडे प्रत्येक मराठी माणूस डोळे लाऊन बसला आहे. तुम्ही त्यांचे आशास्थान बनला अहात. बलस्थान बनला अहात. ...मेरे पास राज ठाकरे है असं तो गर्वानं म्हणतो आहे. मराठी माणसानं विश्वासानं मान टाकावी असा एक शेवटचा खांदा आहे. मराठी माणसाचा हा विश्वास तुम्ही जपायला हवा.



आज सत्तेत असलेले तेरा आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी मिळालेल्या वेळेत जर आपापल्या विभागाचा स्वर्ग बनवला तर पुढचा उरलेला महाराष्ट्र यांच्या गळ्यात संपुर्ण सत्तेची माळ घालेल. पण जर हेच आता कारणं सागंत बसले तर मराठी माणसांनी यांना कोणती कारणं सांगायची?



गेल्या ५० वर्षाचा महाराष्ट्राचा, मुंबईचा, मराठी माणसाचा इतिहास बघितला तर त्याचा पुन्हा पुन्हा तेजोभंग झाला आहे. यानिमित्ताने त्याने तुमच्यावर टाकलेला विश्वास खरा ठरो. मराठी माणूस आणि आपण यानी एकमेकांसाठी घेतलेली ही शेवटची संधी आहे. तुमच्याविषयी मराठी माणसाने बांधलेला अंदाज अभंग राहो. खरा ठरो. मराठी माणसाच्या राजकारणात आणि सत्तेच्या सारिपाटात पुन्हा पुन्हा चुकलेला हा अंदाज कदाचित उद्या मराठी माणसाला म्हणेल मी हरलो तुम्ही जिंकलात आणि तुमच्यासमोर होत जोडून हाच अंदाज म्हणेल साहेब माफ करा चुकलो!



प्रवीण धोपट

99672 93550

pravindhopat@gmail.com

1 comment:

sanjay Pandit said...

like!! i think u r going to be a philosopher.